जामनेर : प्रतिनिधी
लग्नासाठी आलेल्या नवरदेवासह वऱ्हाडींची चांगली व्यवस्था व मानसन्मान न झाल्याने जामनेरात मंगळवारी होऊ घातलेला विवाह सोहळा अर्ध्यावर सोडून वन्हाडी घराकडे परतली. परत निघालेल्या नवरदेव व त्यांच्या नातेवाइकांना मुलीकडच्या लोकांनी बोदवडजवळ अडविल्याचा प्रकार तालुक्यात सोमवारी घडला.
जामनेर येथे सोमवारी साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम असल्याने खासगी बसमधून सकाळीच वर पक्षाकडील मंडळी गावात पोहोचली. पाहुण्यांची मनासारखी व्यवस्था व मानसन्मान मिळत नसल्याने नवरदेव व त्याचे नातेवाईक मंडळी दुपारीच माघारी फिरले, त्यामुळे वधूकडील नातेवाइकांमध्ये चलबिचल सुरू झाली नवरदेवाचे वाहन मध्य प्रदेशाच्या हद्दीत पोहोचले होते, तर वऱ्हाडींची बस बोदवडजवळच होती. तिथे ती अडविण्यात आली. मुलीकडच्यांनी त्यांना जामनेर पोलिस ठाण्यात आणले. रात्रीपर्यंत दोन्ही पक्षांकडून तडजोडीसाठी प्रयत्न करण्यात आले. शेवटी वधूसाठी झालेला खर्च वरपक्षाने भरून द्यावा, अशी तडजोड करून वाद मिटविण्यात आला.