लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: – २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे १३ जागा होत्या. त्यामुळे आता सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले तर त्यात १० जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह आहे.
दरम्यान सर्वपक्षीय पॅनलसाठी स्थापन समितीच्या सदस्यांची बैठक पालकमंत्र्यांचा उपस्थितीत होणार असून, या बैठकीत देखील कोणत्या जागांसाठी आग्रह धरायचा आणि कोणत्या सोडायचा याबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेत भाजपसोबत जायला ‘ग्रीन सिग्नल’ दिला असला तरी या पॅनलमध्ये राष्ट्रवादी जागांबाबत तडजोड करणार नाही अशीच भूमिका घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
जिल्हा बँकेसाठी होणार्या निवडणुकीसाठी जर राष्ट्रवादी काँग्रेसला समाधानकारक जागा मिळत असतील तर सर्वपक्षीय पॅनलमधून निवडणूक लढा, अन्यथा महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपविरोधात लढा अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्या आहेत. त्यानुसार चर्चा करण्यासाठी शुक्रवारी गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेण्यात आली. याबैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष…
एकीकडे भाजप ८ जागांसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीही १० जागांसाठी आग्रही आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने अद्यापही आपली भूमिका जाहीर केलेली नाही. भाजप-राष्ट्रवादीत सुरु असलेल्या वादात सेनेने अजून ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. तरी सर्वपक्षीय बैठकीत भाजप नेमक्या किती जागांवर दावा करेल याकडे लक्ष लागले आहे.
यांची होती उपस्थिती
बैठकीत माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे, माजी आमदार दिलीप वाघ, कैलास पाटील, अरुण पाटील, इंदिरा पाटील, संजय पवार, वाल्मीक पाटील, संतोष चौधरी, नाना देशमुख, तिलोत्तमा पाटील आदी उपस्थित होते. गेल्या महिनाभरापासून जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनल तयार करण्याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, भाजपकडून या पॅनलसाठी प्रतीसाद मिळत नसल्याने आता राष्ट्रवादी कॉग्रेसने देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.